मुख्य संपादक – दिनेश आंबेकर
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
डहाणू, १८ जून – डहाणू ते कोसबाड मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली पावसाळ्यात सातत्याने साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, या मार्गावरील वाहतूक मोठ्या अडथळ्यात सापडत आहे. विशेषतः रिक्षा, दुचाकी आणि इतर लहान वाहनचालकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे.पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहनचालक अंदाजावर गाडी चालवतात. जरा जरी जोरदार पाऊस झाला, तरी संपूर्ण रस्ता जलमय होतो आणि वाहतूक ठप्प होते. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रिक्षा, दुचाकी आणि पादचारी यांची ये-जा असते.
या भागातून जाताना रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्यांवर पाणी उडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही नागरिक थेट रेल्वे ब्रिजवरून रेल्वे लाईन ओलांडण्याचा धोका पत्करतात. ही रेल्वे लाईन सतत सक्रिय असल्याने कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या तीन वर्षांपासून कायम स्थिती स्थानिक रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम आहे. पावसाचे प्रमाण थोडे वाढले की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि वाहतुकीची पार वाताहत होते. मात्र अद्यापही प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.
प्रशासनाची उदासीनता आणि नागरिकांचा संताप
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने स्थायी उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
चौकट:
नागरिकांची मागणी:
संबंधित प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट –
पावसाचे दिवस सुरू झाले की आम्हाला भीतीने गाडी चालवावी लागते. आमच्या तक्रारी कोण ऐकणार? मी कोसबाड रस्त्यावर रिक्षा चालवतो. ब्रिजखाली पाणी साचलेले असल्यामुळे ते बाजूने जाणाऱ्या बाईक आणि पादचाऱ्यांवर उडते. त्यामुळे वाद होतात. ही समस्या लवकरात लवकर सुटली पाहिजे.
- प्रविण प्रकाश पऱ्हाड, स्थानिक रिक्षाचालक