

- उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
जव्हार – पावसाळ्याची चाहूल लागली असली तरीही या वर्षी पावसाने अद्याप दडी मारली आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये शेतमजुरी व रोजंदारीचे काम ठप्प झाले असून, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर श्री रामलाल जे. बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट, कफ परेड मुंबई यांच्या सौजन्याने आणि जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळ यांच्या संयोजनातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जव्हार तालुक्यातील जंगलपाडा, ऐनापाडा, बरफपाडा, धिंडेपाडा, पारधीपाडा, गौंडपाडा, हनुमानपाडा, साखरा या दुर्गम भागातील ३६० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्य तसेच टॉवेल व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
वाटप करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये तांदूळ, डाळ, कडधान्य, साखर, चहा पावडर, गूळ, पोहे, साबण, मीठ, तेल, मसाला, हळद, थंडा पेय, टॉवेल व छत्र्या यांचा समावेश होता. या सर्व साहित्याचे वितरण बगाडिया ट्रस्टचे सेवक अनिल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, सचिव विद्याधर म्हात्रे, कोषाध्यक्ष मिलिंद पाटील, समाजसेवक विष्णू पाटील हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम पाटील यांनी गावातील महिलांशी संवाद साधत मुलांचे शिक्षण, आरोग्य, व अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम स्थानिक अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाने अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमामुळे पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

