संपादक – दिनेश आंबेकर –
मोखाडा तालुक्यातील गर्भवती अविता कवर हिला वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची आणि तिच्याही आरोग्याची हेळसांड झाल्याची घटना समोर आल्यावर या आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षांपासून कायमस्वरूमी वैद्यकीय अधिकारी देण्यात आलेला नाही.प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येथील कारभार चालू आहे.ही बाब या निमित्ताने अधोरेखित करण्यात येत आहे.मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मंजूर पाचपैकी सर्वच्या सर्व वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.यामुळे एकीकडे पालघर जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावाआरोग्य यंत्रणा करत असली, तरी अद्याप येथील मातामृत्य,बालमृत्यू थांबवण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे.अतिदक्षता विभागाची सुविधा मिळवण्यासाठी आजही जव्हार,मोखाडा येथील रुग्णांना तब्बल ७०-८० किमीचा प्रवास करावा लागत आहे.
“मातेचाही बसने प्रवास”
गर्भाच्या मृत्यूनंतर मातेलाही घरी सोडण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने तिला बसने प्रवास करावा लागला.इतकेच नव्हे,तर ती घरी आल्यावरही तिला योग्य उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात दाखल करण्याचे सौजन्य आरोग्य यंत्रणेने दाखवले नाही.माजी आमदार सुनील भुसारा यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्या मातेला स्वखर्चाने खोडाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार सुरू केले आहेत. सरकारची संवेदनाच मेली आहे का,असा प्रश्न भुसारा यांनी केला.या घटनेतील असंवेदनशीलपणाबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो,असे भुसारा यांनी सांगितले.